सोमवार, १६ एप्रिल, २०१८

मनुस्मृतीची बदनामी ब्राह्मणांचे पाप भाग 1

मनुस्मृती, असा एक ग्रंथ ज्याच्याविषयी अनेक वाद आहेत. मनू आणि मनुवाद ही आज शिवी बनली आहे. मनूवर आधारलेले राज्य परत यावे, असा विचार करणे मूर्खपणाच ठरेल; कारण कालौघात त्यापेक्षाही उत्तम सक्षम आणि कालसुसंगत अशी न्यायी व्यवस्था अस्तित्वात आली आहे. मात्र शेकडो- हजारो वर्षांपूर्वी (येथे कालगणनेत अडकून पडायचे नाही) जी व्यवस्था आणली गेली होती. त्या व्यवस्थेचा निटसा अभ्यास न करता (हा आक्षेप मनुस्मृतीच्या समर्थकांना देखील लागू पडतो) एका ग्रंथाचे विश्लेषण केले गेले. नुसतेच विश्लेषण नाही तर त्यासाठी एका धर्माला दोष देत एक जातीवर्ग देखील आजही मनुवादी म्हणजे शोषक असल्याचे सांगितले जाते. त्यासाठीच संस्कृत अभ्यासकांच्या मदतीने मनुस्मृती जशी समजली तशी मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
यात व्यक्त झालेली मते आपल्या सगळ्यांना पटतीलच असे नाही. अगदी मनुविरोधकांना आणि मनूसमर्थकांना देखील यावर आक्षेप असणे स्वाभाविक आहे. आपल्या सूचनांचे स्वागतच आहे. सामाजिक दरी वाढविणारा एक विषय समजावा, आणि आपल्याला समजलेला विषय इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा इतकाच हेतू यामागे आहे.
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटीश काळात इ.स.१७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ. याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला. जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठलाही ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही. तसा दावा करणेही योग्य नाही. जी जी म्हणून धर्मग्रंथ मग ती कोणत्याही धर्माची असू देत ती ती सर्वार्थाने परीपूर्ण आहेत असा दावा एखादा आंधळा अनुयायीच करू शकतो. स्थळ, काळ, स्थिती परत्वे परिस्थिती बदलत राहते आणि त्यात बदल होत राहतो. आपण आपल्या संविधानात देखील संशोधन करत राहतोच. तसेच मनुस्मृति परिपूर्ण नाही. मनुस्मृतीचे समिक्षण त्याची कालसुंसगतता तपासत त्यात संशोधन बदल होणे अपेक्षीत होते मात्र ते देखील घडले नाही.
मनुस्मृति प्राचिण ग्रंथ आहे. श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल. सांगितली आणि लक्षात ठेऊन ती पुढच्या पिढीला परत सांगितली असे तिचे स्वरूप आहे. आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट) मनुस्मृतित स्थान मिळाले असेल. तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल.
मनुस्मृतीच्या आज ५० हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते.
मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इसविसन पूर्व २ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनू आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थाईलंड, कंबोडिया आणि इंडोनेशिया मध्ये देखील झाला होता. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असेही ओळखले जाते.
मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत. ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं| विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत्||
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितला
मनुस्मृती समजण्यापूर्वी पहिल्या दोन भागात सामाजिक बदल आणि मनुस्मृतीवरील आक्षेप समजून घेऊ.   
सोऴाव्या शतकात युरोपीयन समुदाय व्यापाराच्या निमित्ताने भारतात येऊ लागला होता. जिथे शक्य आहे, अशा ठिकाणी आपल्या लष्करी छावण्या उभ्या करत संस्थानं आणि वेगवेगळी सत्ताकेंद्र असलेल्या भारतात त्यांना आपलं बळ उभा करणे सहज शक्य होते. कर संकलन आणि कच्चा माल असा दुहेरी उपयोग भारतभूमीचा होऊ लागला. जो आला तो स्थिरावू लागला आणि हे सोडून जाण्याची त्यांची इच्छाच नव्हती. डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटीश असे या देशात स्थिरावू लागले. पुढे पुढे ब्रिटीशांनी आपले चांगलेच बस्तान बसवले. डच, फ्रेंच परत गेले. पोर्तुगीज काही भूभागापूरते मर्यादीत राहिले. ब्रिटीशांनी मात्र आपले साम्राज्य विस्तारले. सोळाव्या शतकात भारतात आलेले हे व्यापारी पुढे अठराव्या शतकात या देशाचे शासक बनले.
युरोपियन लोकांचे धार्मिक अधिष्ठान ख्रिश्चन धर्म होते. परंपरावादी तरीही वैज्ञानिक  दृष्टी असलेल्या युरोपियन समुदायांनी त्यांचा एकेश्वरवाद पुढे करत ईथल्या देव आणि देवतांची धार्मिक परंपरांची टिंगल उडवायला आणि त्याला चुकीचे ठरवायला सुरुवात केली. अतीशय भडक स्वरूपात भारतीय परंपरा जगाला सांगत भारतात फक्त गोंधळ आहे असे भासवायला सुरुवात केली. याच काळात सेवाव्रत घेऊन आल्याचे दाखवत मिशनरी देखील धर्मांतरासाठी आपली पाये रोवत होती. हे मिशनरी आपल्या सत्ता आणि संपत्तीच्या बळावर इथल्या परंपरा आणि धर्मांना वेडगऴ आणि चुकीच्या ठरवत होतीच. पाश्चात्त्य विचारवंतांनी आपल्याकडच्या संस्कृतीवर मांडलेला विचार ईतका प्रभावी ठरला की आजही अनेकजण त्याच विचारांनी झपाटून सुव्यवस्था बाहेरून आणली पाहिजे असे सांगत आहेत.
यानंतर अमेरिका वसाहतवादातून मुक्त झाली, आणि नव्या विद्यापिठीय ज्ञानाची पध्दत तेथे सुरू झाली. याच काळात तिथे संरजामशाही असलेल्या कथॉलिक ख्रिश्चन विचारधारेला प्रोटेस्टंट पंथाने नाकारले होते. आणि विज्ञानवादी दृष्टिकोण धर्मश्रध्दा नाकारत होते. याच भूमिकेतून ते पूर्वेच्या धर्माकडे बघत होते. त्यांनी हिंदू धर्माला खलनायक ठरवत हिंदूंना शोषीत माणायला आणि तसे सांगायला सुरुवात केली. स्वतःला हिंदूचा तारणहार किंवा उध्दारकर्ता असं मानू लागले.
रामायण, महाभारत हे पुरुषसत्तावादी महाकाव्य ठरू लागले. राम प्रेमळ राजा यापेक्षा पत्नीला छळणारा आणि साम्राज्यवादी खलपुरुष मांडल्या गेला. क्षीरसागरात बायकोला पाय चेपायला लावणारा विष्णु पुरूषसत्ताक माणसिकतेचे प्रतीक बनवल्या जाऊ लागला. याला हिंदू मुलतत्त्ववाद  असे नाव देत पश्चिमेकडील विद्वानांनी भारतीय परंपरा आणि प्रतीकांची यथेच्छ नालस्ती केली. याला संशोधनाचे रूप दिले.
भारताकडे कांहीच नाही, आहे तो फक्त संभ्रम आणि गोंधळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते य़शस्वी ठरत गेले. या नियोजनबध्द आक्रमनाला भांबावलेला भारतीय हिंदू पोपटाच्या भयसापळ्याप्रमाणे अडकत राहिला. आपली संस्कृती व परंपरावर होणारे आक्रमण बघता तो या परंपरांना अधिक घट्ट चिटकू लागला. या आक्रमणाची प्रतिक्रीया म्हणून तो आपल्या धर्मपालनात आंधळेपणाने आक्रमक झाला. यात परत पाश्चिमात्य  विचारवंतांचे फावले. आक्रमक होत आमचा धर्म असाच आहे, तो चांगला आहे असे सांगणा-या लोकांना खलपुरूष ठरवत त्यांनी कांही लोकांना आपल्याबाजूने ओढण्यात यश मिळवले. स्वार्थी विरोधक आणि आंधळे अनुयायी यांनी हिंदू संस्कृती बदनाम केली आणि त्याचा प्रभाव आजही दिसतो आहे.

लक्ष्मी विष्णुचे पाय चेपते हे पुरुषी वर्चस्व असेल तर, शिवाच्या छातीवर उभी राहणारी काली स्त्रीवर्चस्व मानावी लागेल. आपल्या अक्राळविक्राळ रूपात जगाला जीभ दाखवत दुष्टांना भयचकित आणि चित करणारी कालीची प्रतिमा स्त्री सबला आहे, हे सांगणारीच होती. शिव अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दिसतो. तर भगवान विष्णू मोहिनीरूप धारण करतात, ही कशाचे द्योतक आहेत. हिंदू पुराणातील कथा, प्रतीके आणि कर्मकांड या नातेसंबंधाविषयी खूप कांही सांगत जातात. आपण त्यातून तात्पर्य काढायचे असते याचा विसर आपल्याला पडला. निसर्गतः जी माता आहे. सांस्कृतिक अर्थाने जी दुहिता आहे, मानव जातीची निर्माती आहे, ती माणुसकीची निर्मिती आहे. तीच असते ज्ञान, तिच असते शक्ती आणि तीच असते संपत्ती. मग तीच ठरते सरस्वती, दुर्गा आणि लक्ष्मी या रूपांना आणि प्रतिकांना समजून न घेता वर म्हटल्याप्रमाणे भयसापळ्यात अडकलेल्या पोपटांनी आपल्या ज्ञानाची पोपटपंची करत धर्म टिकविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपले महत्त्व अबाधित राहील हा स्वार्थी हेतू ठेवला, त्यातूनच या अफवा आणि गैरसमज निर्माण झाले.

वामन आणि बळीची कथा अशीच; तिच्यातील प्रतीकं समजून न घेता दोन कथानायकांना दोन जातीचे प्रतिनिधी करत द्वेश हिणत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी झाला. ही कथा खरेच घडली असेल का? आणि आणि निर्माण झाली असेल तर कशासाठी? याचा शोध घ्यावाच लागेल. अभ्यासक म्हणून नाही मात्र वाचून जे समजते त्यातून तर असे वाटते की, हे जग मर्यादित असले तरी मानवी संसाधने अमर्यादीत आहेत. मानवाच्या अडचणी आणि गरजा या वस्तु देऊन कोणीच सोडवू शकत नाही. त्यासाठी माणसाने आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या विचारांचा परीघ रुंदावेल तेंव्हाच त्याला गरजा, भय ओळखता येइल आणि इतरांच्या या गरजा आणि भय याविषयी त्याला सहानुभुती दाखवता येईल. हे असे करणेच खरा मानवता धर्म असतो. वामन आणि बळी हे दोघेही कथापात्र हाच संदेश देण्यासाठी योजिलेली असावीत. आपणच त्यांना जातीचे प्रतिनिधी करण्याच्या षड्यंत्राला बळी पडलो.
ख्रिश्चन मिशनरी वर्गाला जपानने आपल्या देशातील महारोग्यांची सेवा करण्यासाठी भूखंड नाकारला. जेवढे म्हणून कांही  बौध्द देश आहेत तिथे मिशनरी वर्गाला प्रवेशच दिला नाही. चिनमध्ये मदर तेरेसा यांना थांबू दिलं गेले नाही. त्या भारतात आल्या स्थिरावल्या आणि भारतरत्न झाल्या. ख्रिश्चन मिशनरी वर्गाला भारतात मात्र मोकळे रान मिळाले आणि त्यांनी आपले काम केले.
भारतातील सततच्या युध्दात अनेक क्षात्रवीर मारले गेले. भारताचे क्षात्रतेज क्षीण होत असताना ब्राह्मण्य देखील बदलू लागले. अस्थिर राज्यात स्वतःला स्थिर आणि सक्षम करण्याच्या प्रयत्नात ब्राह्मण आपले कर्तव्य विसरून गेले आणि कर्मकांडांना घट्ट चिटकत तोच सुटकेचा मार्ग समजू लागले. याच काळात देशात ( ईसविसन 300 पासून) बौध्दमताचा प्रसार सुरू झाला होता. धर्मरक्षण म्हणजे यज्ञयागादी कार्य, असाच समज रूढ झाला. लोककल्याण याऐवजी स्वकल्याण याला अधिक महत्त्व आले. पुढे पुढे पश्चिमेकडील मुस्लीम आक्रमक वाढली. क्षात्रतेज क्षीण झाले. तर ब्राह्मण आपला वर्ण श्रेष्ठत्वाचा दूर्गूण सोडायला तयार नव्हते.
मनुस्मृतीच्याच श्लोकाचा दाखला द्यायचा तर
परित्येजेदर्थकामौ यौ स्यानां धर्मवर्जितो।
धर्मं चाप्यसुखोदर्कं लोकसंकुष्टमेवच।।
अर्थात धर्माला विरोधी असणा-या अर्थाचा आणि कामाचा त्याग करावा. जे आचरण लोकांमध्ये आक्रोश निर्माण करते व त्याचा परिणाम दुःखात होतो तो धर्म असला तरी वर्ज्य करावा.
नेमकी हीच शिकवण मनूचे अनुयायी विसरले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपले वर्तन ठेवू लागले. ब्राह्मण आचारभ्रष्ट झाला आणि कर्मकांडांत गुंतला. कौशल्याचा वापर करत उदरनिर्वाह करणा-या शुद्रांवर गुलामीचे जिणे आले. परकीय आक्रमक या दुहीचा फायदा घेत होते. क्षात्रधर्म क्षीण झाला होता. ब्राह्मण्य आचारभ्रष्ट झाले होते. व्यापारातील नैतिकता संपुष्टात येत होती. आणि परकीय आक्रमकांना ही आदर्श स्थिती निर्माण होऊ लागली होती. पहिले गुलाम बनवत कांही आक्रमकांनी राज्य केले. त्यानंतर इंग्रजांनी हा जातीय द्वेष खोलवर रुजेल याची व्यवस्था केली आणि भारत जातीपातीत विखुरला गेला. जातीपातीच्या भिंती भक्कम होत होत्या.
त्याचा परिणाम म्हणून भारतात आज अनेक वादप्रवाद चालू आहेत. त्यासोबत अनेक संकटे देखील आहेत. कट्टरतावाद, नैतिक अपराध, माहितीच्या विस्फोटासोबत भ्रामक माहितीच्या आधारावर तयार झालेली संभ्रमित अवस्था. स्वच्छताविषयक अनास्था, अनारोग्य यासोबतच भ्रष्टाचार, दहशतवाद या समस्यांनी देखील आपले जाळे पसरायला सुरूवात केली आहे. धार्मिक व जातीय भावना अधिक टोकदार होत आहे. जन्मासोबत मिळणारी जात आणि लिंगभेद या आणखी कांही समस्या या काळात वाढल्या आहेत. जात आणि लिंगभेद या समस्यांनी तर देश मोठ्या संकटात जात आहे.
या सगळ्या समस्या कोणत्या एका धर्मात नाही, तर सगळ्याच धर्माच्या सांस्कृतिक समस्या होऊन बसल्या आहेत. लिंगभेद ही वर्षानुवर्षापासून जागतिक स्तरावरची अडचण आहे. तर जातिप्रथा ही आशिया त्यातही दक्षीण आशियातील समस्य़ा आहे. या  भागातील सगळ्याच धर्मात ही अडचण जाणवेल. पण, त्यातही हिंदू धर्म सगळ्यात जुना असल्याने या कुप्रथांचे खापर हिंदू धर्मपध्दतीवर फोडले गेले. याच कुप्रथांना आपण चालवत राहिलो तर एक दिवस हा देश धार्मिक आणि जातीय तुकड्यात अधीक तीव्रतेने विखुरला जाईल.


लेखक-- सुशील कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा